महाराष्ट्र हेडलाईन्स : फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांचे अनुदानास वितरणास राज्य सरकारने ( State Govt) मान्यता दिली आहे. त्यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळणार आहे.
३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकरी :
राज्य सरकारने ( State Govt) एकूण ३४ जिल्ह्यातील ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, वर्धाम गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजी नगरसाठी ५९ कोटींचा निधी मंजूर :
नागपूर विभागातील ५० हजार १९४ बाधित शेतकऱ्यांसाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपयांचा तर अमरावती जिल्ह्यातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांना ६६ कोटी १९ लाख ११ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांसाठी ५९ कोटी ९८ लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
तर पुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ बाधित शेतकऱ्यांना ८१ कोटी २७ लाख २७ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार असून कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांना ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७बाधित शेतकऱ्यांना ८५ कोटी ६७ लाख ८ हजार रुपयांचा निधीला मान्यता देण्यात आली आहे.
डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वाटप :
दरम्यान, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभहस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वाटप करण्यात येणार आहे. अनुदानासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे.